Posts: 1,114
Threads: 699
Joined: Sep 2016
'प्रकल्प' हा शब्द पूर्वी प्रकल्पकर्त्यांना प्रेरणा द्यायचा, राज्यकर्त्यांना विकासाचे समाधान द्यायचा आणि प्रकल्पग्रस्तांना सर्वस्व उखडले जाण्याची धास्ती बसवायचा. त्यात आजही फारसा फरक पडलेला नाही, परिस्थितीत काही बदल झाला आहे तो शैक्षणिक वर्तुळात. इथे 'प्रकल्प' धडकी भरवतो शिक्षकांना. नवीन 'शिक्षा'नीतीमध्ये विद्यार्थ्यांकडून 'प्रकल्प' करून घेणे बंधनकारक आहे.
'प्रकल्प' पध्दतीने शिक्षण सकस होते हे निर्विवाद. पण, केव्हा? मुळातच शिक्षण सकस होते ते शिकणाऱ्याची इच्छा आणि शिकविणाऱ्याची तळमळ यांचा संयोग झाला की! द्रोणाचार्यांची मातीची मूर्तीही मग गुरू होते, शिकण्याची जबर इच्छा असणाऱ्या एकलव्याची! गुरू नसतानाही शिकता येते पण शिष्य नसताना शिकविता येत नाही. गुरू असेल तर शिष्याच्या कुवतीनुसार, समजुतीनुसार शिक्षणाचे कार्य सुरळीत होते. आश्रमात शिकणाऱ्या शिष्यांना केवळ लिहिणे-वाचणे आकडेमोड एवढयापुरतेच शिक्षण मिळायचे नाही तर जगण्याचेच शिक्षण अहोरात्र मिळायचे.
त्याचप्रमाणे 'प्रकल्प' करण्याच्या माध्यमातून विविधतापूर्व शिक्षण मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे.
प्रकल्पग्रस्त
'प्रकल्प' प्रकरणामुळे अनेक शिक्षक प्रकल्पत्रस्त झालेले आढळतात. प्रत्येकाच्या वर्गात साठ ते सत्तर विद्यार्थी. प्रत्येकाला वेगवेगळा प्रकल्प द्यायचा. एवढे प्रकल्प आणायचे तरी कुठून? शिक्षण मार्गदर्शिका, पाठयपुस्तके, स्वाध्यायमाला, सेल्फ स्टडी वगैरे गोष्टींच्या वापरातून काही प्रकल्प मिळतात पण ते पुरेसे नसल्याची तक्रार अनेक शिक्षक करतात. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र प्रकल्प असल्याने, त्यांचे लिखाण करून घेणे, त्या प्रकल्पांच्या वह्या तपासणे, ही कामे अनेक पटींनी वाढतात. निबंध, गृहपाठ त्यामानाने तपासायला सोपे जाते कारण प्रश्न एकाच प्रकारचे असतात. त्यांची नमुना उत्तरे असतात. त्यात बसणाऱ्या उत्तरांना गुण द्यायचे; त्या बाहेरच्या उत्तरांना गुण द्यायचे नाहीत. ही पध्दत सोपी म्हणजे डोक्याला विचाराचा त्रास नाही. या उलट प्रकल्प म्हणजे अनेक प्रश्न, अनेक उत्तरे, अनेक प्रकार, अनेक विचार _ गुणपट्टी थिटी पडते. खरं तर त्यामुळेच शिक्षकांना नवीन काही शिकण्याची संधी मिळते. ताजे वेगळे अनुभव मिळतात, तेही अनायासे.
काही शिक्षकांना प्रकल्प शोधण्याचा ताण येतो. त्याचे एक कारण म्हणजे त्यांना सर्व विद्यार्थ्यांना आपणच प्रकल्प पुरविले पाहिजेत असे वाटते. आपल्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आपली असल्याने आणि तो कामाचा डोंगर खरोखरच मोठा असल्याने त्याचे दडपण येते.
आईला आपल्या लेकरांबाबत वाटणाऱ्या काळजीशी याची तुलना करता येईल. एक-दोन मुलांच्या आईच्या काळजीच्या तुलनेत त्रैराशिक मांडून साठ-सत्तर विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या काळजीचे प्रमाण खरोखरच दडपण आणणारे आढळून येईल.
काळजी घेणे आणि काळजी करणे
यातला फरक समजून घेतला तर पालकत्व सुजाण होते. अवलंबन आणि स्वावलंबन यातला फरक वर्तनात आला तर नागरिकत्व सुजाण होते. त्याच धर्तीवर प्रकल्प करायला देणे आणि प्रकल्प करू देणे यातला फरक ध्यानात आला तर शिक्षकांवरचा भार कमी होईल.
विषय कसा सुचणार ?
विद्यार्थ्यांना प्रकल्प करू देण्यासाठी पहिली पायरी म्हणजे त्यांना प्रकल्प सुचू देणे.
आपल्याला काय करायचे आहे, हे विद्यार्थ्याच्या मनातूनच उमटले तर ते करण्याची प्रेरणा अंतर्मनात सतत राहील. त्याच्या जोरावर प्रकल्पाचे काम सतत करण्याची आणि पूर्ण करण्याची शक्यता वाढेल. त्या अनुभवांमधून नवे काही शिकायला मिळेल. अनेकदा शिक्षणाच्या बांधीवपणामुळे काही नवे, वेगळे करण्याची भावना कोमेजून जाऊ शकते.
एक प्रयोग करून पहा. तुम्ही तुमच्या समोर असणाऱ्या लोकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या गटाला कागद आणि रंग देऊन 'कोणतेही' चित्र काढायला सांगा. 'कोणतेही' म्हटल्यावर काही जण 'कोणते चित्र काढू?' अस विचारतील. तरीही 'कोणतेही' असेच म्हणा. बघा कोणी कोणी कोणकोणती चित्रे काढली आहेत. माझ्या अनुभवानुसार, बऱ्याच जणांनी एकाच प्रकारचे चित्र काढलेले असेल, ते म्हणजे - त्रिकोणी डोंगर, उगवता सूर्य, सर्पाकार नदी, एखादे झाड, एखादी झोपडी, चारच्या आकारातले पक्षी आणि असेच काही. संधी मिळाल्यावरही बरेच जण तिचा वापर काही नवीन स्वतःचे असे करण्यासाठी करतीलच याची खात्री नाही.
नेहमीच्या शिक्षणात असे स्वतःचे नवे काही करायला वाव थोडाच असतो. अक्षर, शब्द, आकडे, वाक्ये, व्याकरण, प्रयोग, पाढे तसेच्या तसे काढायला लागणारच पण निबंध, चित्र, कल्पनाविस्तार करताना तोच पठडीबध्दपणा कशाला हवा? जिथे शक्य आहे तिथे कल्पना करायला, त्या अंमलात आणायला वाव दिला पाहिजे.
एखाद्याने ज्ञानेश्वरी पाठ केली आणि जशीच्या तशी सांगितली किंवा लिहिली म्हणजे तो ज्ञानेश्वर होत नाही. विज्ञानाच्या पुस्तकात सांगितलेले प्रयोग जसेच्या तसे सिध्द झाले म्हणजे करणारी व्यक्ती वैज्ञानिक होत नाही.
ज्ञानेश्वरीचे निरूपण करताना ज्ञान वाढते.विज्ञानाचे प्रयोग करताना अपेक्षेपेक्षा वेगळी निरीक्षणे आली तर ती का वेगळी आली याचा मागोवा घेण्यासाठी धडपडून पुन्हा पुन्हा प्रयोग करणारी व्यक्ती वैज्ञानिक बनते. प्रकल्प या संकल्पनेत ही शक्ती आहे.
माझी मुलगी शाळेत होती तेव्हाची गोष्ट.
तिने एकदा शाळेतून आल्या आल्या सांगितले,
''आम्हाला प्रकल्प करायला सांगितलाय. कोणता करू?''
मी विचारले, ''कोणत्या विषयाचा? कोणत्या धडयावर?''
ती म्हणाली ''असं काही नाही. कोणताही करायला सांगितलाय.''
मी म्हणालो, ''मग, कोणताही कर.''
ती म्हणाली, ''पण, कोणता?''
मी म्हणालो ''तुला दिसेल तो.''
ती म्हणाली मला ''सगळंच दिसतंय.''
इथे मला पोपटाचा डोळा आणि अर्जुनाची नेमबाजी ही गोष्ट आठवली.
मी म्हणालो, ''हात लांब करून बोट दाखव. डोळे मीट. स्वतःभोवती चकरा मार. थोडया वेळाने थांब. डोळे उघड आणि तू दाखवलेलं बोट कुठे जातंय ते बघ.''
तिनं तस केले. डोळे उघडल्यावर तिच्या बोटाने दाखवला होता _ स्वयंपाकाच्या ओटयावरचा मिसळणीचा डबा! मग तोच झाला तिचा प्रकल्प- मिसळणीचा डबा!
त्यात कोणकोणते पदार्थ असतात? ते कुठून येतात? ते कसे बनवितात? त्यांचे गुणधर्म, उपयोग कोणते? मग काय-मोहरी, हळद, तिखट, मसाले, हिंग, मेथी, मीठ यांचाच एक 'प्रकल्प' झाला आणि तो तिच्या शाळेत नावाजला गेला.
असाच आणखी एक प्रसंग घडला.
तेव्हा प्रकल्पासाठी विषय मागणाऱ्या व्यक्तीला मी विचारले,
''तुझ्या मनात आत्ता कोणता शब्द आला?''
तिने सांगितले, 'गवत'.
झाली प्रकल्पाला सुरुवात.
आपल्या परिसरात कोणकोणत्या प्रकारचे गवत उगवते?
त्याची वाढ कशी होते?
त्याला फुले कधी येतात?
बिया कधी येतात?
ते कधी कोमेजते?
निरीक्षणे व निष्कर्ष
एका मुलाला वैज्ञानिक प्रकल्प स्पर्धेत भाग घ्यायचा होता. तेव्हाही मी हाच प्रयोग करून पाहयला. तेव्हा शब्द आला 'प्रदूषण'. मग गेल्या दोन महिन्यात वर्तमानपत्रात छापून आलेले प्रदूषणाचे आकडे आणि तापमानाच्या नोंदी यांची संगत लावण्याचा प्रकल्प तयार झाला. तो प्रकल्प बक्षीस विजेता ठरला. काही अनोखेपण असेल तर प्रकल्प वेगळा ठरतो. वैज्ञानिक प्रकल्पात काही आकडेवारी पाहिजेच आणि त्यांची संगती लावून काही सूत्र शोधता आले पाहिजे. मग त्यापुढे निष्कर्ष, अनुमान स्वतंत्र येते.
अकरावीच्या वीस जणांचा गट माझ्याकडे प्रकल्पासाठी होता. त्यांना मी सांगितले की आपल्या प्रकल्पात एक तृतीयांश भाग तरी स्वतःचा पाहिजे. चर्चा झाली. सर्वांनी मिळून एक विषय ठरवला.
तो होता 'कॉलेजच्या चौकातील वाहतूक कोंडी.'
चौकाचा नकाशा काढला. त्यात रस्त्याच्या कडेच्या काही जागा निश्चित केल्या. ज्यांना जशी सवड होईल त्याप्रमाणे त्यांनी ठरावीक जागी उभे राहून, ठरावीक दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या नोंदवायची, त्यातल्या प्रवाशांची संख्या नोंदवायची. सिग्नलची वेळ नोंदवायची,चालणाऱ्यांचीही नोंद करायची. असे महिनाभर करून एक जंगी आकडेवारी मिळवली. आता प्रत्येकाने त्यातल्या विशिष्ट प्रकारच्या वाहनाचे व प्रवाशांचे एकूण वाहने व प्रवाशांशी गुणोत्तर काढायचे आणि या प्रत्येकाचा वाहतूक कोंडीशी असणारा संबंध शोधायचा. कोणी सायकलींच्या कोणी रिक्षांच्या, कोणी मोटारींच्या, कोणी बसच्या, कोणी पादचाऱ्यांच्या, कोणी सिग्नलच्या वेळाच्या, तर कोणी पोलिसाच्या असण्यानसण्याच्या, असल्यास त्याच्या उभ्या रहाण्याच्या जागेवरून वाहतूक कोंडीशी त्यांचा काय संबंध आहे याचे निष्कर्ष काढले. कोणते बदल अपेक्षित आहेत तेही सुचविले. शहरातील वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी, वाहनांचे प्रदूषण, त्यांचे परिणाम ही माहिती मिळविली. ङ्काहिती सर्वांच्या प्रकल्पात सारखीच होती. पण प्रत्येकाचे निष्कर्ष स्वतंत्र होते.
तात्पर्य
एकूणात काय? तर प्रकल्पकर्त्यांच्या मनातच तो निर्माण व्हायला पाहिजे. प्रकल्प कसे लिहावेत, कसे तपासावेत याचे काही तंत्र आहे. ते विविध ठिकाणी उपलब्ध आहे. त्याबद्दल अनेकांना माहिती आहेच.
असे प्रकल्प एकदा झाले की त्यातून पुढच्या प्रकल्पांचे विषय सामोरे येतात. त्यासाठी थोडा वेळ, थोडे डोके, थोडी कृती, थोडी वाटचाल करायला पाहिजे. विज्ञान किंवा पर्यावरणातच नाही तर अगदी भाषा, गणित, समाजशास्त्रे यामध्येही असे प्रकल्प आढळतील.
शब्दांचा उच्चार आणि त्यांचे लेखन,
दोन भाषांमधील समान उच्चार पण भिन्न अर्थ असणारे शब्द, म्हणी-वाकप्रचार यांचे उगम, त्यांच्या गोष्टी, बोलीत असणारे पण प्रमाणभाषेत नसणारे शब्द, दुसऱ्या भाषेतून येऊन रुळलेले शब्द, वाकप्रचार असे कितीतरी प्रकल्प भाषा प्रकल्प म्हणून घेता येतील.
इतिहासाचा प्रकल्प म्हटला तर आपल्या रस्त्याला, चौकाला, भागाला असलेल्या नावामागचा इतिहास शोधता येईल.
हवामान पिके यांचा संबंध शोधता येईल.
भौमितिक आकार आहेत.
रोज बदलत जाणारे वस्तूंचे दर हा अर्थशास्त्राचा प्रकल्प होऊ शकतो.